हिमायतनगर : हिमायतनगरमधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
या वेळी प्रा. डॉ. वसंत कदम म्हणाले, ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. सगळीकडे स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकत होता; पण मराठवाड्यात निजामाच्या फर्नाणानुसार तिरंगा ध्वज फडकवण्यास बंदी घालण्यात आली होती. अशा निजामाच्या अन्यायी व हुकमी राजवटीच्या विरोधात हैदराबाद संस्थानातील जनतेने सशस्त्र लढा उभारला. त्यामुळेच १७ सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती पत्करली व मराठवाडा मुक्त झाला. म्हणून १७ सप्टेंबर १९४८ हा मराठवाड्याचा खरा स्वातंत्र्यदिवस आहे.’
या वेळी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रभाकर मधोळकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला के. सदावर्ते, मुख्याध्यापिका श्रीमती खंबायतकर, उपप्राचार्य डाके सर, ज्येष्ठ नागरिक शक्करगे, द. ल. मुधोळकर, दिलीप पाटील-लवरेकर, आकलवाड सर, वराडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शेख शहेनाज, सदस्य प्रा. मुकेश यादव, प्रा. गजानन दगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शेख शहेनाज यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. गजानन दगडे यांनी केले. या वेळी कन्याशाळेचे व कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.